कामगार मंत्र्यांनी केला कंपनी मालक आणि कामगार संघटना यांच्यात समेट; कामगारांशी संपमागे घेण्याबाबत सकारात्मक चर्चा

0



मुंबई: वालचंदनगर येथील मे. वालचंदनगर इंडस्ट्रीजमध्ये 42 दिवसांपासून सुरु असलेल्या कामगारांच्या संपाबाबत कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज कंपनी मालक आणि कामगार संघटना प्रतिनिधी यांच्यात समेट घडवून आणत संप मिटविण्याबाबत कामगारांशी सकारात्मक चर्चा केली. यावेळी कामगार मंत्र्यांनी कंपनीने कामगारांचे थकीत वेतन दोन महिन्यांत द्यावे, कामगार आणि कंपनीमध्ये झालेला करारनाम्याचे दोन महिन्यांत नूतनीकरण करावे, अशा सूचना दिल्या.

मंत्रालयातील समिती कक्षात याबाबत कामगार मंत्री डॉ. खाडे यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार उमा खापरे, हर्षवर्धन पाटील, कामगार आयुक्त सतीश देशमुख, उपायुक्त दादासाहेब खताळ, अभय गीते, कंपनीचे व्यवस्थपकीय संचालक चिराग दोशी, महाव्यवस्थापक संजय गायकवाड, उपाध्यक्ष धीरज केसकर, कामगार संघटनांचे अध्यक्ष राहुल नावडेकर, कपिल गायकवाड, गणेश सानप, नीलेश गुळवे, सुनील माने, सराजी दबडे उपस्थित होते.

कंपनीच्या आस्थापनेवर असलेल्या कामगारांचे फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल २०२३ या तीन महिन्यांचे वेतन थकीत होते. वेतनवाढ, वैद्यकीय देयके अशी २०२१ पासूनची थकीत देणी, तसेच कामगार संघटना व कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये कामगारांचे वेतन आणि भत्त्यासंदर्भातील करार प्रलंबित होता. या मागण्यांसाठी कामगारांनी संप पुकारला होता. हा संप मिटवण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांच्या मागणीनुसार कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी यात समेट घडवून आणला.

यावेळी कामगार मंत्री यांनी इंडस्ट्रीने कामगारांचे थकीत वेतन आणि इतर कायदेशीर देणी मिळून होणारी ७ कोटी ८५ लक्ष रुपयांची रक्कम तीन टप्प्यात द्यावी, असे सांगितले. ४० टक्के रक्कम कामगार रुजू होताच सात दिवसांत द्यावी. तसेच उर्वरीत ६० टक्के रक्कम दोन महिन्यांत ३० टक्के प्रमाणे देऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत १०० टक्के थकित रक्कम अदा करावी. शिवाय कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यातील करार हा एक महिन्यात संपुष्टात येईल, त्याचे नूतनीकरण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी देण्यात आला. तसेच कामगारांनी सुद्धा ४ जानेवारीपासून संप मागे घेऊन तत्काळ कामावर रुजू व्हावे. कंपनीने कोणत्याही कामगारावर कारवाई करू नये, असे निर्देश कामगार मंत्री डॉ. खाडे यांनी दिले.

कामगारांच्या विश्वासावर कंपनी उभी राहते. कामगारांनी सुद्धा संपावर जाण्यामुळे त्यांचे स्वत:चे नुकसान होते याचा विचार करावा. संपावर जाण्यापूर्वी व्यवस्थापनाशी चर्चा करावी आणि कंपनीने सुद्धा चर्चेला सकारात्मक प्रतिसाद देऊन कामगारांच्या मागण्या मान्य केल्यास कंपनी आणि कामगार दोघांचेही नुकसान टाळता येईल- डॉ. खाडे

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top