महाराष्ट्राला ई पंचायतराज पुरस्कार...केंद्र शासनाने ‘ई-पंचायत पुरस्कार – 2020’ चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव

0
मुंबई, दि. 16 : आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्ज्वल परंपरा पुढे चालू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ‘ई-पंचायत पुरस्कार – 2020’  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. अरविंदकुमार, उपसचिव श्री. प्रविण जैन उपस्थित होते.
राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला.

ई-पंचायत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या देशातील 3 राज्यांना दरवर्षी ई-पंचायत पुरस्कार देण्यात येतो.
भारतीय घटनेतील 73 व्या घटना दुरुस्तीनंतर भारतीय घटनेच्या कलम 243 नुसार पंचायत राज संस्थांना महत्त्वपूर्ण अधिकार देण्यात आले असून केंद्र व राज्य सरकारच्या बहुतांशी विकास योजना या पंचायत राज संस्थामार्फत राबविण्यात येतात. पंचायत राज संस्थांचे बळकटीकरण करुन त्यांच्या कारभारात सुसूत्रता व पारदर्शकता आणण्याच्या हेतूने केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत ई-पीआरआय (e-PRI) हा उद्देश मार्ग प्रकल्प (Mission Mode Project) सन 2011 पासून हाती घेतला आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पंचायती राज संस्थांच्या कारभारामध्ये ई-पंचायत प्रकल्पांतर्गत अभिप्रेत असलेली एकसूत्रता व पारदर्शकता आणणे, नागरिकांना विविध प्रशासकीय विभागांतर्गत सेवा-दाखले त्यांच्या रहिवाशी क्षेत्रात कालबद्ध स्वरुपात मिळणे, तसेच इतर व्यावसायिक सेवा, जास्तीत जास्त बँकिंग सेवा ग्रामीण जनतेला एकाच केंद्रावर मिळाव्या या हेतूने राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये CSC e-Governance Services India Ltd. या केंद्र शासनाच्या कंपनीच्या सहकार्याने “आपले सरकार सेवा केंद्र (ASSK)” स्थापन करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top