महाराष्ट्र दर्शन न्यूज | मुंबई :
महाराष्ट्रात पारा वेगाने वर चढत असून उष्णतेची लाट आता राज्यभर पसरतेय. या उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. वायव्य, मध्य आणि पश्चिम भारतात निर्माण झालेल्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पारा चाळीशीच्याजवळ पोहोचला आहे. वारंवार होणाऱ्या हवामान बदलांमुळे बळीराजा मात्र मेटाकुटीला आला आहे. विदर्भात उन्हाचा तडाखा सुरूच असून बुधवारी अकोल्यात ४४ अंश इतके तापमान नोंदविण्यात आले.
अकोला, अमरावती आणि बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर इतर जिल्ह्यांना तीन दिवसांसाठी थोडाफार दिलासा मिळणार आहे. मात्र, या तिन्ही दिवसांत अकोल्यातील उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर १० एप्रिलला अकोल्यासह बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांतही उष्णतेची लाट असेल.
नगर, औरंगाबाद, जालना, हिंगोली आणि अकोला या जिल्ह्यातही मार्चअखेर तापमान खूप होते. आता या जिल्ह्यांना थोडासा दिलासा मिळालेला आहे. मागील आठवड्यात मराठवाड्यातही परभणी आणि नांदेड या दोन्ही केंद्रांवर ४१ अंशांहून अधिक कमाल तापमान नोंदले गेले.
राज्यात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव अनेक जिल्ह्यांत जाणवत आहे. राज्यातील कोकणसह मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या प्रदेशांत उष्णतेच्या लाटेचा प्रभाव दिसत आहे. त्यामुळे लोक हैराण झाले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद